ग्रामपंचायत कर व फी नियम । How does gram panchayat collect tax


   ग्रामपंचायत कर आकारणी कशी करते? । Gram Panchayat Taxes and Fees Rules

Gram Panchayat Taxes and Fees Rules

ग्रामपंचायत कर व फी नियम । How does gram panchayat collect  tax पंचायतराज हा भारतीय राज्यघटनेतील अविभाज्य घटक आहे. भारतासारख्या आकाराने मोठ्या असलेल्या देशातील नागरिकांना त्यांचे हक्क व अधिकार प्राप्त व्हावेत. तसचे, देशातील गाव-खेडी समृद्ध व्हावीत. या हेतूने त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अशी रचना करण्यात आली. २ ऑक्टोबर, १९५९ रोजी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उद्घाटन होऊन, देशात पंचायतराज लागू झाली. १ मे १९५९ ला प्रथम राजस्थान राज्याने पंचायतराज व्यवस्था स्वीकारली. तर महाराष्ट्र हे पंचायतराज व्यवस्था स्वीकारणारे नववे राज्य ठरले.

ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने कोणती?

अनुदान हा ग्रामपंचायतीच्या उत्पन्नचा सर्वात मोठा स्रोत आहे. केंद्र, राज्य व जिल्हा परिषद यांच्याकडून गावविकासाठी विशिष्ट अनुदान प्राप्त होत असते. तसेच, गावातील विविध करांच्या माध्यमातून पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती, यात्रा, कोंडवाडे, बाजार, इत्यादी करांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीस उत्पन्न प्राप्त होत असते. गावातील एकूण महसुलापैकी (ग्रामनिधी पैकी) ७० टक्के महसूल जिल्हा परिषदेकडे द्यावा लागतो. उर्वरित ३० टक्के महसूल ग्रामपंचायत खर्च करू शकते. ग्रामनिधीचा कारभार  ग्रामसेवक (ग्रामविकास अधिकारी) सांभाळत असतो.


ग्रामपंचायत कर आकारणी कशी केली जाते?

मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ आणि त्यातील कायदा कलम १२४ व त्याअंतर्गत महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी (शुल्क) नियम १९६० यामधील तरतुदीनुसार गावाच्या सीमेतील इमारती (मग त्या कृषी आकारणीस अधिन असोत किंवा नसोत) व जमिनी यावर कर आकारण्याचा अधिकार ग्रामपंचायतीस देण्यात आलेला आहे. त्यामध्ये निवासी व औद्योगिक वापरानुसार घरपट्टीची आकारणी केली जाते. ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या अधिकृत वा अनधिकृत बांधकामावर कर आकारणी लावून कर वसूल करणे ग्रामपंचायतींना बंधनकारक आहे. घरपट्टी आकारण्यासाठी सबंधित घर/इमारत ग्रामपंचायतीच्या नमुना ८ मध्ये नोंद असायला हवी. कर दर पत्रक राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने महाराष्ट्र कर व फी सुधारणा नियम २०१५ साठी सुधारित अधिसूचना जाहीर केली असून या अधिसूचनेनुसार ग्रामपंचायतीकडून वसूल केली जाणारी घरपट्टी (कर) बांधकामांच्या भांडवली मूल्यावर आधारित असते. २०१५ पूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील घरांना प्रति चौरस फुटाला घरपट्टी आकारली जात होती. त्यात बदल करून भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी आकारण्यासाठी अधिसूचना जाहीर केली. बांधकामाच्या भांडवली मूल्यावर किंवा त्याच्या भागावर पुढीलप्रमाणे कर ग्रामपंचायत आकारणी करते. इमारतीचे भांडवली मूल्य पुढील गणिती सूत्रानुसार निश्चित केले जाते.

इमारतीचे भांडवली मूल्य = 【 (इमारतीचे क्षेत्रफळ × जमिनीचे वार्षिक मूल्यदर ) + (इमारतीचे क्षेत्रफळ × बांधकामाच्या प्रकारानुसार बांधकामेचे दर × घसरा दर) 】× इमारतीच्या वापरानुसार भरांक

हे देखील वाचा : सरपंच अविश्वास ठराव

इमारतीवरील कराचा दर: 

१. झोपडी किंवा मातीची इमारत

किमान दर : ३० पैसे; कमाल दर:  ७५ पैसे

२. दगड, किंवा विटा वापरलेली मातीची इमारत

किमान दर:  ६० पैसे; कमाल दर:  १२० पैसे

३. दगड, विटांची व चुना किंवा सिमेंट वापरून उभारलेली इमारत

किमान दर:  ७५ पैसे; कमाल दर:  १५० पैसे

४. आरसीसी पद्धतीची इमारत

किमान दर:  १२० पैसे; कमाल दर:  २०० पैसे

जमिनीवरील कराचा दर:

जमिनीच्या प्रति रुपये १००० च्या भांडवली मूल्यावर किंवा त्याच्या भागावर

किमान दर:  १५० पैसे; कमाल दर:  ५०० पैसे

मनोऱ्यावरील कराचे दर:

मनोऱ्याचे तळघर (प्रति चौरस फूट)

किमान दर:  ३ रुपये; कमाल दर:  ८ रुपये

मनोऱ्यातील खुली जागा ( प्रती १०० चौरस फूट)

किमान दर:  २० पैसे; कमाल दर:  ४० पैसे


पाणीपट्टी व दिवाबत्ती कर:

पाणीपट्टी ही पाणी पुरवठा केल्यामुळे आकारण्यात येते. साधारण पाणीपट्टी ही सार्वजनिक पाणीसाठ्याद्वारे पाणी पुरवठा केला जातो असं गृहीत धरून आकारली जाते. नळ कनेक्शन असेल तर नळाच्या आकारानुसार किमान व कमाल दरापैकी ग्रामपंचायतीने ठरवलेल्या दरानुसार आकारणी केली जाते. याचबरोबर आरोग्य कर व दिवाबत्ती करही आकारला जातो. दिवाबत्तीचे वीजबिल, गावातील स्वच्छता, गटारी साफ करणे, जंतुनाशक औषध फवारणी केली जाते. त्यासाठी किमान व कमाल दर ठरलेले असतात, त्यानुसार दिवाबत्ती कर आकारणी केली जाते. 

ग्रामपंचायत कर जर नाहीच भरला तर?

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम (सुधारणा) २०१५ यामधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धारकाला भरावाच लागतो, तो कधीही माफ होत नाही. तसेच, थकबाकी रकमेवर दरवर्षी व्याजसुद्धा भरावे लागते. कर भरण्याची नोटिस पाठवून कर भरला नाही तर कराच्या रकमेच्या वस्तू जप्त करून लिलाव करण्याचा ग्रामपंचायतीला अधिकार असतो. आणि अशा कार्यवाहीचा खर्चही वसूल केला जातो. एवढे होऊनही शेवटी कर हा भरावाचा लागतो. 

ग्रामपंचायत करातून कोणाला सूट मिळते?

बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजने अंतर्गत माजी सैनिक व सैनिक विधवा/पत्नी यांना मालमत्ता करातून सूट देण्यात येते. तसेच, एखादी घर/इमारत सतत तीन महिने व त्याहून अधिक रिकामी व अनुउत्पादित राहिल्यास करातून सूट मिळते. किंवा कराची रक्कम परत मिळते. मात्र रिकामी व अनुउत्पादित असल्याची वस्तुस्थिती लेखी नोटीस देऊन ग्रामपंचायतीस/सरपंच यांस कळवणे अनिवार्य असते.

ग्रामपंचायत कर आकारणी संबंधित महत्त्वाच्या बाबी व नियम: 

 ग्रामपंचायत कर आकारणी यादी दर चार वर्षांनी 'कर आकारणी समिती' कडून सुधारित केली जाते. 

 दिनांक १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष गृहीत धरून कर आकारणी केली जाते. 

 जर आर्थिक वर्षाच्या पहिल्या ६ महिन्यात ग्रामपंचायतीला कर भरला तर ५% सवलत मिळते.

 कर आकारणी करण्यात येणाऱ्या चालू आर्थिक वर्षात कर भरला नाही, तर त्या करदात्याला थकीत कराच्या रकमेवर दरवर्षी ५% दंड भरावा लागतो.


 सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा त्यांच्याद्वारे नेमून दिलेल्या कोणत्याही व्यक्तीला कर वसुली करता येते. मात्र त्या व्यक्तीने कर भरणा केलेल्याची पावती करदात्याला देणं बंधनकारक असते.

 ज्या ग्रामपंचायतीची ९० टक्के (पूर्वी ७० टक्के होती) करवसुली होते त्यांना १०० % कर्मचारी अनुदान मिळतं.

 असा कोणताही कर किंवा फी आकारल्यामुळे किंवा लादल्यामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला पंचायती समितीत अपील करता येतो. पंचायती समितीच्या आदेशाविरुद्ध स्थायी समितीकडे अपील करता येतो. मात्र स्थायी समितीचा निर्णय अंतिम असतो.

मित्रांनो, ग्रामपंचायत कर हा कोणालाही चुकलेला नाही. तो आज न उद्या भरावा लागतो, तेही दंडासहित. लवकर कर भरून, ५% सवलत घेऊन त्याबदल्यात सुविधा मिळवता येतात. जास्त कर वसुली झाल्यास ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच वेतन शासनाकडून भेटते. नाहीतर, ग्रामनिधीतून हा खर्च केला जातो. जोपर्यंत, नियमानुसार इमारती/ घरे आणि जमिनी यांची नोंद करून कर वसुली केली जाणार नाहीत. तोपर्यंत, लोकं जागे होणार नाहीत, जेंव्हा जागे होतील त्यावेळी ग्रामपंचायतीला कर्तव्याची जाणीव होईल.

हे देखील वाचा : ग्रामसभा नियम व अटी

माहिती आवडली तर इतरांसोबत नक्कीच शेअर करा आणि माहिती संबंधित काही प्रश्न असल्यास खाली टिप्पणी करून कळवा किंवा 'संपर्क फॉर्म' भरुन 'माझा गाव' ला संपर्क करा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

• दिव्यांगांसाठीचा कायदा | दिव्यांग व्यक्ति हक्क अधिनियम २०१६ 

• महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान २०२१

• ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो?


टिप्पणी पोस्ट करा

14 टिप्पण्या

  1. मी Dingore गावचा रहिवासी असून, माझे सेतघर हे गवठणापासून 2 किमी अंतरावर आहे. कच्चा रस्ता आहे, रोडलाईट नाही, पाणी नाही. तसेच घराची नोंदही नाही. ह्या वर्षी ग्रामपंचायतीने ९००० रूपये घरपट्टी लावली आहे.क्षेत्रफळ ,कार्पेट,built up,superbuilt upकी kimativar टॅक्स लावला आहे असे सांगितले नाही.
    माझी केस अशी आहे की,मी गावठाणात नाही,ग्रामपंचायतीच्या कुठलाच सुविधा नाही,तर एवढा टॅक्स कसा? कुठे ॲपील करता येईल.
    कृपया उत्तर कळवा.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ नुसार असा कोणताही कर किंवा फी आकारल्यामुळे किंवा लादल्यामुळे व्यथित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला पंचायती समितीत अपील करता येते. पंचायती समितीच्या आदेशाविरुद्ध जिल्हा परिषद स्थायी समितीकडे अपील करता येतो. मात्र स्थायी समितीचा निर्णय अंतिम असतो. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायद्याचे कलम १२४ वाचा.

      हटवा
  2. माझे घर 710 स्वेर फूट आहे मी पुन्हा वर बांधकाम केले आहे आहे साधारण माझ्या घराचे बांधकाम 1500 स्वेर फूट आहे तर मला साधारण किती घरपट्टी लागला हवी आणि असा काही नियम आहे का कि दुसऱ्या.जवळचा वेक्ती असेल तर त्याला वेगळी घरपट्टी जर मला इतर लोकचे घरपट्टी काय आकारली आहे ते मला माहितीचा स्वरूपात बगता येईल का कारण मला शंका आहे कि माझ्या गावात असे होते

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मला माझा घराचे अंदाज पत्रक आणि ईतर कागदान वर गामसेवक च्या सही साठी काही कर भरावा लागतो का

      हटवा
  3. मि माझ्या प्लाट ची फेर फार अर्ज ग्रामपंचायत ला दाखल केला, परंतु माझ्या कडे ग्रामपंचायत च्या गाडे भाडे थकबाकी आहे. तर ग्रामसेवक ने असे म्हटले कि, जो पर्यंत गाडे भाडे थकबाकी वसूली पुरनपने मिळत नाही तोपर्यंत प्लॉटचा फेरफार ग्रामपंचायत ला नोंद करत नाही.
    तर माझ्या मते गाडे भाडे व प्लाट चा कर लावने या दोन गोष्टी चा काय संबंध आहे, आनखी एक गोष्ट गाडे भाडे थकबाकी वसूली हे मि स्वतः कोर्टात लिहून दिले की 31मार्च2022 पर्यंत थकबाकी जमा करीन. तर हा ग्रामसेवक का मनून अडवतो.... जरा मला मार्ग दर्शन कराल.

    उत्तर द्याहटवा
  4. आधी सर्वांना नमस्कार. माझे ग्राम पंचायत हद्दीतील ६० चौ/फूट गावठाण जागेवर माझे लहानसे किराणा दुकान आहे जे लोखंडी पत्रापासून बनविले आहे. तर त्यावर ग्राम पंचायत ने वार्षिक ९०० रु कर आकारणी केली होती . कर आकारणी कमी करण्याबाबत ग्राम पंचायत कडे अर्ज सादर केला असता त्यांनी ९०० च्या ऐवजी १२०० रु कर आकारणी केली आहे. उलट त्यांनी कर आकारणी केली असल्याची मागणी पत्र पुरविला नाही. तर ती योग्य/ अयोग्य आहे त्याबद्दल माहिती द्यावी.आणि अयोग्य असेल तर त्यावर कमी करण्यासाठी काय उपाय करावे लागेल त्याबद्दल माहिती द्यावी ..

    उत्तर द्याहटवा
  5. आमच्या घराकडे येणाऱ्या रसत्याची ग्रामपंचायतीकडे नोंद नाही.23 नंबरला नोंद व्हावी म्हणुन अर्ज करुण दोन वर्ष झाली तरी नोंद केली नाही. म्हणून मी ग्रामपंचायत कर भरला नाही योग्य आहे का?

    उत्तर द्याहटवा
  6. माझ्या जागेत अतिक्रमण करून माझे चुलते रहातात आणि त्रास देऊन त्यांनी ग्रामपंचायत घरपट्टी स्वतःच्या नावावर केली आता माझी जागा कशी मोकळी करून घेऊ

    उत्तर द्याहटवा
  7. मी ग्रामीण भागातील रहिवासी आहे, मी आठ वर्षे सतत घरपट्टी चा भरणा केला आहे, पण मागील पाच वर्षांपासून ग्रामपंचायत घरावरील कर घेण्यास नकार देत आहे.कारण घर नोंदणी रजीस्टर मध्ये खाडाखोड करून घर मालकित बदल करण्यात आला आहे, तर मी घरपट्टी भरणा कसं करावं माहिती द्यावी ही विनंती.

    उत्तर द्याहटवा
  8. नमस्कार, मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला परंतु मला अजूनही थकबाकी वसुली ची पध्दत याबद्दल माहिती सापडली नाही. कृपया माहिती द्यावी की गावकरी नागरिकांकडून कर वसुलीची विहित पद्धत कोणती आहे???

    उत्तर द्याहटवा
  9. शाळा साठी ग्रामपंचायत कर मधे सूट आहे काय?

    उत्तर द्याहटवा
  10. नमस्कार सर, मी ग्रामपंचायत मध्ये नवीन नळ कनेक्शन घेतले आहे त्यासाठी त्यांनी माझ्याकडे 4300 इतकी रक्कम डिपॉझिट म्हणून मागितली आहे. कायद्यामध्ये अशी रक्कम मागता येते का ग्रामपंचायत ला

    उत्तर द्याहटवा
  11. नमस्कार.., सर मी न्हावरे ता. शिरूर जि. पुणे येथील स्थानिक रहिवासी असून.... न्हावरे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामपंचायत मिळकत ३९२/२ मध्ये असलेल्या शिरूर चौफुला रोड लगत असणाऱ्या जागेत मी माझे वडिलांना ग्रामपंचायतीतर्फे भाड्याने मिळालेल्या जागेत गेली ३० वर्षांहूनही अधिक काळापासून व्यवसाय करत आहे. सदर जागा आज ग्रामीण रुग्णालय यांना ग्रामपचायतीतर्फे वरील रोड लगत कायम स्वरुपी मा.जिल्हा अधिकारी यांच्या आदेशा प्रमाणे दिलेली आहे. तरी पण पूर्वश्रमीचे जामीन धारक यांनी ग्रामपंचयतीतील काही सदस्य आणि सरपंच ग्रामसेवक यांच्याशी संगनमत करुन सन २००१ मध्ये ग्रामपंचयती विरोधात दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली की ग्रामपंचयतीने आमच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या अतिक्रमण करून २९ आर इतके क्षेत्र अतिक्रमित केलेले आहे. आणि एवढंच नव्हे तर ग्रामपंचयतीतर्फे कोणीच जबाबदार व्यक्ती अथवा ग्रामसेवक यांनी या दाव्याला उपस्थित n राहता १ वर्षाच्या आत निकाल करून घेतला आहे.
    .. आत्ता त्याच बेकायदेशीर निकालाचा वापर करून ग्रामपंचयतीची खरेदी जामीन लुबडण्याचा प्रकार आमचे शिरूर तालुक्यातील कनिष्ठ न्यायालयात चालू आहे.चक्क खरेदी केलेली आणि गावासाठी दवाखाना एस टी स्टँड साठी वर्ग केलेल्या जमिनीच्या रोड लगत असलेल्या जागेवर कायदेशीर प्रक्रिया बेकायदेशररित्या वापरून ती मोक्याची जागा बळकावण्याचा कट गेली ३०वर्षांपासून बिनधोक चालू आहे.
    ...या प्रकरणी आधिकारिक रित्या कोणाकडे दाद मागता येईल अशी माहिती आपन द्यावी

    उत्तर द्याहटवा
  12. ग्रामपचायतींच्या सरपंच ग्रामसेवक यांच्याशी संगनमत करुन केलेला जामीन गैरव्यवहार

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.