माझ्या गावातील गणेशोत्सव ! Ganpati Utsav In Konkan


कोकण गणेशोत्सव | गणपती उत्सव निबंध मराठी


माझा आवडता सण गणेशोत्सव मराठी निबंध
घरगुती गौरी गणपती

माझ्या गावातील गणेशोत्सव ! Ganpati Utsav In Konkan | My Favourite Festival Ganesh Chaturthi in Marathi माझ्या गावातील गणेशोस्तव म्हणजे जणू भक्ती, चैतन्य, आनंद आणि उत्साहाला उधाणच. गणेशोत्सव म्हटला की अवघ्या कोकणी माणसाला आपल्या गावाकडील गणपती आठवल्याशिवाय राहत नाही. मग ते गाव खेडे कोकणातील कोणतेही असो. ज्याचे बालपण कोकणात गेले असेल आणि या उत्सवाच्या वेळी ती व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी त्याचे पाय गावच्या गणपतीकडे आपोआप वळतात आणि सर्व चाकरमानी कोकणाची वाट धरतात. आमच्या गावातील गणेशोस्तव म्हणजे सारा गावच मोरया च्या भक्तीत तल्लीन होउन जातो. मुंबईतील चाकरमानी गणेश चतुर्थीच्या अगोदर साधारणत: २-३ दिवस गावाकडे येतात. गणपती बसवण्याच्या जागेवर विविध प्रकारचे डेकोरेशन केले जाते. आपले डेकोरेशन इतरांपेक्षा सुंदर कसे होईल याचा विचार सारे जण करतात. बघता बघता २ दिवस निघून जातात अन गणपतींचे आगमन वाजत गाजत होते. घरोघरी आपापल्या परंपरेनुसार  पाच, सात अथवा दहा दिवस गणपती बसवतात. गावात वेगवेगळ्या वाड्या असतात. काही ठिकाणी ५ ते ६ घरांची एक वाडी असते तर काही वाड्या ३० ते ३५ घरांच्या असतात अन प्रत्येकाकडे गणपती असतो.


गणरायांच्या आगमनानंतर सगळीकडेच आनंद, उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पसरले असते. या वेळी गावातील सर्व जुने मित्र भेटतात. गावातील निसर्गाचे वेगळे रूप यावेळी पाहायला मिळते. शेतीची कामं आता थोडी कमी झालेली असतात, पावसाचा जोर ओसरलेला असतो. भातशेती चहुबाजूनी बहरलेली असते. सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. तो शेतीचा सुगंध वेगळाच आनंद देतो. रंगीबेरंगी रानफुलांनी धरणी सजलेली असते. वाऱ्याच्या झोक्यावर डुलणारी हिरवी शेतं मखमलीचा भास निर्माण करीत असतात. नदीतील पाणी कमी झालेले असते. त्यामुळे मित्रांसोबत मनोसोक्त पोहायला मिळते. शेतातील कोवळ्या काकड्या खायला मिळतात. त्या गावठी काकड्यांची मजा काही औरच असते. लहानपणी चोरून खाल्लेल्या काकड्याची आठवण प्रत्येकाला होते. सारे मित्र भेटल्यावर तर लहानपणीच्या आठवणींमध्ये रमून जातात. वाड्या- वाड्यांमध्ये मित्रांच्या गप्पांचे अगदी फड रंगतात.


साधारण सर्वांचा गणेशोत्सवातील दिनक्रम असा असतो-

रोज सकाळी उठल्यावर पूजेसाठी रानफुले आणि गणपती साठी दूर्वा आणणे,नदीवर अंघोळीला जाणे. मनसोक्त डुंबून झाल्यावर घरी परतणे. दुपारी मित्रांच्या घरी गप्पा. रात्री कोणाच्या घरी कोणता कार्यक्रम करायचा याची आधीच आखणी केली जाते. त्यानंतर मस्त चुलीवरचे खमंग जेवण. त्या जेवणाची मजा शहरातील जेवणापेक्षा वेगळीच असते. यावेळी गावातली सर्व घरं सदोदीत सगळ्यांसाठी उघडीच असतात. या दिवसात कुणाच्या घरी जाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसते. सगळ्या गावाचं एक मोठ्ठं कुटुंबच एकत्र नांदत असतं. संध्याकाळ झाली की प्रत्येकाच्या घरी आपापल्या वाड्यांमध्ये ढोलकीच्या गजरात आरत्या करतात. या आरत्यांच्यावेळी घरातील महिला मंडळी उत्साहाने भाग घेतात. आरती झाल्यावर प्रत्येकाच्या घरातून प्रसाद म्हणून कडक बुंदीचे लाडू, फरसाण आणि मिळणारा गावरान मेवा काकडी, टरबूज, केळी फस्त करतात. रात्री जेवण झाल्यावर उत्सवाला खरी रंगत येते. काही वाड्या मधे भजनांच्या मैफिली होतात तर काही ठिकाणी शक्ती-तुरा बारी होते. कोणाच्या घरी  गाण्यांच्या तालावर वेगवेगळे फुगड्यांचे  प्रकार सादर केले जातात, तर कधी ढोलकीच्या ठेक्यावर मंगळागौर नृत्ये सादर केली जातात. तर काही ठिकाणी गरबाही खेळला जातो. यामध्ये तरुणींपासून ते वयस्कर स्त्रियांपर्यंत सर्व भाग घेतात. हा सारा प्रकार पहाटेपर्यंत चालू असतो. काही जणांच्या घरी गौरी पूजनही केले जाते. गौरी आणल्या जातात. साधारण गणेश चतुर्थीच्या नंतर दोन दिवसांनी गौरी बसवल्या जातात. त्यांना नटवले जाते. नव्याने लग्न झालेल्या माहेरवाशिणी गौरी पूजनाला माहेरी येतात. त्यानंतर मात्र सर्वत्र आनंदमय वातावरण असते. या दिवसांत उकडीच्या मोदकांचा सुगंध सर्वत्र पसरलेला असतो.


बघता बघता गणपती विसर्जनाचा दिवस कधी येतो कळतच नाही. अनंत चतुर्थी दिवशी दुपारच्या आरती आटोपल्यावर सर्व वाड्यांमधील गणपती वाजतगाजत, ढोल ताश्यांच्या गजरात एकत्र बाहेर काढले जातात, फटाक्यांची आतषबाजी होते आणि बाप्पाच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक काढली जाते. नामे वाडी पासुन गणपतीची मिरवणूक काढायची ते थेट भेंडीचे भाटले (आमचे गणपती विसर्जनाचे ठिकाण).


गणेश उत्सव माहिती मराठी
गावातील गणपती विसर्जन सोहळा

या मिरवणुकी मध्ये आमच्या गावातले पार्लेश्वर वडापाव सम्राट मा. श्री वसंत रामजी नामे दरवर्षी सतत काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतात. लोकांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारची सोंगे ( महामानव, डायनासोर इ.) खास मंबईवरून आयोजन करतात. त्यामुळे मिरवणुकीला वेगळीच रंगत येते. त्यांचा हा उत्साह खरच उल्लेखनीय आहे. मिरवणूक विसर्जनच्या ठीकाणी पोहचल्यावर वाडीतील सर्व गणपतींची सार्वजनिक महाआरती एकत्र केली जाते ,गणपतीला गाऱ्हाणं घातलं जातं, नवस बोलले जातात. पुढच्या वर्षी लवकर या अशी बाप्पा पुढे केविलवाणी विनवणी केली जाते.

आभाळ भरले होते तु येताना | आता डोळे भरुन आलेत तुला पाहुन जाताना |

अश्या प्रकारे माझ्या गावातील गणेशोत्सव (Ganpati Utsav In Konkan) सणाची सांगता होते. शेवटी उदास अंतःकरणाने, "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा घोषणा देत गणरायाला निरोप देऊन नदीमध्ये गणपती विसर्जन केले जाते. आणि भारावलेल्या अंतकरणाने, जड पावलांनी हातावर प्रसाद घेऊन गावकरी मंडळी घराकडे वळतात. 'गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला' म्हणणारा चाकरमानीही पुन्हा एकदा गावाला राम राम करून मुंबईकडे वळतो तो वर्षभराची ऊर्जा घेऊनच.


तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या