गावचा सरपंच कसा असावा?


गावचा सरपंच कसा असावा?

गावचा सरपंच कसा असावा? | How should be the Sarpanch of the village in marathi 'खेड्यांचा देश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत देशात एकूण ६,४९,४८१ गावे आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातील गावांची संख्या ६३,६३३ एवढी आहे. देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ६५.५३% लोकं गाव-खेड्यात राहतात. त्यामुळे, आजही बहुसंख्य नागरिक खेड्यातच राहतात. म्हणजे भारत हा खेड्यांचाच देश होता आणि आजही आहे. त्यामुळे खरा भारत हा खेड्यातच राहतो. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान, औद्योगिकरण आणि इतर क्षेत्रात बरीच प्रगती केली. शहरांची झपाट्याने प्रगती झाली. आज स्वतंत्र मिळून ७३ वर्षे उलटून गेली. मात्र, देशातील गाव-खेडी आजही ओस पडलेली, उदास, भकास, सोयी-सुविधांचा अभाव असलेली का दिसून येतात? हा खरचं मोठा प्रश्न आहे.


गाव-खेड्यांमधून अनेक लोकांचे शहराकडे स्थलांतर झाले आणि आजही होत आहे. लोकांना आपली जन्मभूमी सोडून शहरात जाणं अजिबात आवडत नाही. परंतु, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नाईलाजाने शहरात स्थानांतरित व्हावं लागतं. याचं मुख्य कारण म्हणजे गावातील रोजगार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव. आपल्या गावचा सर्वांगणी विकास व्हावा, रोजगार उपलब्ध होऊन वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, कित्येक काळापासून गावावर राज्य करण्याऱ्या गाव गावपुढारींने ते केले नाही किंवा त्यांना करता आले नाही.

हे देखील वाचा : ग्रामसभा नियम व अटी

आज देखील गावा-गावात सरपंच पदाची घराणेशाही दिसून येते. ही चांगली गोष्ट नाही. निवडणूक तर फक्त नावाची होत असते. 'राजनीतीत' राहून 'राजकारण' खेळण्यात ते उत्तम पटाईत झालेले असतात. 'गावाचा विकास' त्यांनी स्वतःच्या बँकखात्यात जमा करून ठेवलेला असतो. काही जण सरपंचपद ते मंत्रीमंडळ अशी राजकीय कारकिर्दी सुरू करण्यासाठी या क्षेत्रात उतरत असतात. अश्यांना गावाच्या विकासाशी काहीही घेणं देणं नसतं. त्यात गावाचं नुकसानच होत असतं. हेच चक्र वर्षांनू-वर्षे पुढे चालत आलेले असतं. अश्याने पुढील शंभर वर्षे जरी उलटली तरी गावाचं चित्र काही बदलणार नाही. त्यासाठी एक जिद्द आणि चिकाटी असलेलं सक्षम नेतृत्व गावात असायला हवं. सद्यस्थितीत ग्रामपंचायतीला पहिल्यापेक्षा अधिक बळकटी मिळाली आहे. सरपंचाला एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीप्रमाणे अधिकार प्राप्त झाले आहेत. यात अजिबात अतिशोयक्ती नाही. पण सरपंचाला स्वतःच्या अधिकारांची माहिती नसते. काहींना ते अधिकार माहित असेल तरी त्यांना उपयोगात आणत नाहीत किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात ते सक्षम नसतात.



सरपंचने ठरवलं तर आपल्या छोट्याश्या राज्याला (गावाला) नंदनवन बनवू शकतो. मात्र सर्वप्रथम त्याने तसे  'ठरवणे' महत्वाचे आहे. अर्थातच हे वाटतं तितकं सोप्पही नसतं. गावातील समाज, जात, वाडी, गावकी, भावकी आणि मानपान इत्यादी अनके कटकटी, अडचणी असतात. या सर्वांवर मात करून, ग्रामोउन्नतीचा ध्यास ठेवून वाटचाल केली तर नक्कीच मार्ग सापडतो. त्यासाठी सरपंचाला तलाठी, ग्रामसेवक किंवा एखाद्या शासकीय अधिकाऱ्यामागे हाजी हाजी करत बसायची गरज नाही. आपले अधिकार गाजवून तो गावासाठी खूप काही करू शकतो. राज्यात अशी अनके नंदनवनं फुलली आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने पाटोदा गाव, हिवरे बाजार व राळेगणसिद्धी अश्या आदर्श गावांचा उल्लेख करता येईल. त्या गावातील सरपंचानी अनके प्रश्न, अडचणीना सामोरे जात आपल्या गावाचं नाव लोकांसमोर 'आदर्श गाव' म्हणून ठेवलं. अश्या सरपंचाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपापली गावे विकासपथावर नक्कीच आणता येतील.

सरपंच भास्करराव पेरे पाटील

औरंगाबाद जिल्हयातील पाटोदा गावाचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना आज महाराष्ट्रातील प्रत्येक गाव-खेडे ओळखतात. स्वतःच्या गावासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असलेले सरळ आणि साध्या स्वभावाचे व्यक्तीमत्व. गावात विज, पिण्यायोग्य पाणी, चांगले रस्ते, उत्तम शिक्षण आणि आरोग्य या पाच गोष्टींवर त्यांनी भर दिला. गावातील लोकांसाठी अनके स्तुत्य उपक्रम गावात राबवले. उच्चशिक्षीत नसले तरीही, त्यांची इच्छाशक्ती मात्र प्रचंड होती. त्यांनी सर्व अडचणीवर मात करीत एक आदर्श गाव निर्माण केले. गावात राबवलेल्या उपक्रमाबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात.

मोफत पिठाची गिरणी
ग्रामपंचायतीला घरी टॅक्स मागायला जायची गरज पडत नाही. वर्षाकाठी ९०% ते ९५% कर वसुली होते. ग्रामपंचायततर्फे गावात धान्य दळण्यासाठी मोफत पिठाच्या २ गिरण्या सुरु करण्यात आल्या आहेत. या अभिनव उपक्रमाचा लाभ, कर भरणारे प्रत्येक कुटुंब घेत असुन त्यांना वर्षभर मोफत दळुन दिले जाते.

वाढदिवस उपक्रम
ग्रामपंचायतीद्वारे गावातील प्रत्येक ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा, त्यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात येतो, एक वृक्षरोप देऊन वृक्ष संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात येते.

सी.सी.टी.व्ही कॅमेरे
गावात शाळा, कार्यालय व महत्वाच्या ठिकाणी एकुण ३२ सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सी.सी टी व्ही कॅमेरामुळे नोकरवर्गावर नियंत्रण ठेवले जाते तसेच गावातील प्लॉस्टिक बंदी, गुटका बंदी, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन व गावाची सुरक्षा करीता मदत होते.

सामुहिक भोजन उपक्रम
प्रत्येक महिन्याच्या ३ ऱ्या शनिवारी संपुर्ण नागरिकासांठी समुह भोजनाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात येतं. हा उपक्रम गावात वर्षभर राबविण्यात येतो.  

कचरा व्यवस्थापन
गावातील ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी २ कचरा कुंड्याची व्यवस्था ग्रामपंचायत तर्फे करण्यात आली आहे. कचरा संकलित करुन कचऱ्यापासुन कंपोस्ट खत तयार करण्यात येते.

सौर दिवे व बायोगॅस
गावात विविध ठिकाणी १५ सौर दिवे लावण्यात आले. बायोगॅसचे एकुण ११ प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आले आहेत. त्यापैकी बायोगॅसचे २ प्रकल्प शौचालयाला जोडण्यात आले.

वटवृक्ष आणि महिला
वटपोर्णिमेनिमित्त गावातील महिलांना वटवृक्षाच्या रोपट्यांची ग्रामपंचायतकडुन भेट देण्यात येते तसेच, महिला बचत गट आणी विविध प्रशिक्षणाचा लाभ महिलांना देण्यात  येतो. यासारखे अनके उपक्रम गावात राबवून त्यांनी गावाला स्वयंपूर्ण बनवले.


गावचा सरपंच कसा असावा?

सरपंच पोपटराव बागूजी पवार

पोपटराव पवार हे अहमदनगर जिल्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे सरपंच. शिक्षण एम. कॉम पर्यंत झालेलं. १९७२ मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळात गावातील शेती पूर्णपणे उध्वस्त झाली होती. लोकांकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन शिल्लक नव्हते. बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आणि त्यातून अनेक लोकांना दारूचे व्यसन जडले. १५ वर्षे हे सर्व हिवरे बाजार हे गाव सहन करीत होते मात्र यातून कोणीही मार्ग काढायला तयार नव्हते. १९८९ साली पोपटराव पवार हे गावचे सरपंच झाले. त्यांच्या डोक्यात सतत गाव सुधारण्याच स्वप्न होते. आणि त्या स्वप्नाने ते पूर्णतः झपाटून गेले होते. योग्य नियोजन आणि गावाचा विकास आराखडा तयार करून त्यांनी ते स्वप्न प्रत्यक्षात आणले.

वृक्षारोपण
गावात झाडे तोडण्यावर बंदी करून वृक्षारोपणावर भर दिला. त्यामुळे गावातील नैसर्गिक सौंदर्य जपले गेले.

व्यसनमुक्ती
गावात पूर्णतः दारूबंदी केली. त्यामुळे गावातील कौटुंबिक जीवनातील कलह कमी झाला. 

अतिक्रमण
आपली जमीन, गावाबाहेरच्या परक्या माणसाला विकायची बंदी केली. त्यामुळे परकीय अतिक्रमण आटोक्यात आले.

प्राथमिक शिक्षण
प्राथमिक शिक्षणावर ग्रामपंचायतीने मोठा भर दिला आहे. त्यामुळे गावात १००% ने साक्षरतेचे प्रमाणे वाढले.

भूजल संधारणाची कामे
श्रमदानातून भूजल संधारणांच्या कामांमुळे, गावात भूजल पातळी वाढली आणि गाव पाणीदार झाले. त्यामुळे शेतीपूरक व्यवसायाला गती मिळाली.

रोजगार निर्मिती
गावात व्यवसाय-उद्योगांना चालना देऊन, रोजगार निर्मिती केली. यामुळे रोजगार लोकांचे स्थलांतर थांबले व गावाचे दरडोई उत्पन्न वाढले. एवढेच नव्हे तर, शहरात स्थलांतरित झालेली लोकं जन्मभूमीत परतले.

आज या गावाचं Smart Village in Maharashtra मॉडेल महाराष्ट्रातील जवळपास १००० गावामध्ये महाराष्ट्र सरकार राबविण्याचा प्रयत्न करीत आहे.



राळेगण सिद्धी

अहमदनगर तालुक्यात असलेले राळेगण सिद्धी हे एक गाव. लष्करी सेवेतुन निवृत्त झालेले अण्णा हजारे जेव्हा स्वतःचं गाव राळेगण सिद्धीला परतले, तेव्हा त्यांनी सर्व गावकर्‍यांना सोबत घेऊन गावाचे रूप पालटण्याचा दृढ  निश्चय केला. त्यांनी पाणलोट क्षेत्रात कमालीची कामगिरी केली. वाहून जाणारे पाणी पुन्हा पाणलोटात आणण्याची यातील पद्धत राज्यातील गाव-खेड्यांना दुष्काळमुक्त करणारी आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात गावात झाडे लावली. टेकड्यांवर विशिष्ट प्रकारे बांधबंदिस्ती करून वाहून जाणार्‍या पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप थांबवली. हे पावसाचे पाणी साठवून वापरण्यासाठी मोठे कालवे तयार केले. त्यामुळे पाण्याची भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली. ऊर्जेच्या क्षेत्रामध्येही या गावाने मोठी मजल मारली. रस्त्यांवरचे दिवे सौरऊर्जेवर चालवले. सर्व स्वच्छतागृहे व शौचालये येथील ४ मोठ्या बायोगॅस सयंत्राना जोडली. पाणी उपसण्यासाठी गावात एक मोठी पवनचक्की बसवली. एवढेच नाही तर घराघरांतदेखील स्वतंत्र बायोगॅस सयंत्रे ही सुरू केली. त्यामुळे हे गाव देशात 'आदर्श गाव' म्हणून उदयास आलं.

वरील उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल की, पोपटराव पवार उच्च शिक्षित होते मात्र भास्करराव पेरे पाटील जास्त शिकलेले नाहीत. तरीही दोघांनी आपापली गावे आदर्श करून दाखवली. गावच्या विकासासाठी सरपंच किती शिकलेला आहे याला फारसं महत्त्व नाही. परंतु तो किती कार्यक्षम आहे? लोकांच्या समस्यांची त्याला किती जाणीव आहे? आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तो किती सक्षम आहे? या गोष्टी महत्वाच्या आहेत. एखाद्या गावाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सरपंचला प्रामुख्याने स्वतःच्या गावाबद्दलची आपुलकी, दृढ निश्चय, प्रचंड इच्छाशक्ती, कामालीची जिद्द आणि योग्य नियोजन या पाच पैलूंची आवश्यकता असते.

हे देखील वाचा : सरपंच अविश्वास ठराव

आदर्श सरपंच असावा कसा? Sarpanch Kasa Asava?

• समाजसेवेची आवड असणारा असावा

 गावाचा विकास हेच ध्येय मानणारा असावा

 ग्रामसभेत बोलणारा आणि ऐकणारा असावा

 भाषा विनम्र आणि आदरपूर्वक असावी

 सर्व समाज समभाव मानणारा असावा

 कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली नसावा

 विरोधकांना सामावून घेणारा असावा

 शासकीय योजना लोकार्पण करणारा असावा

 शासकीय विविध योजना गावात आणणारा असावा

 अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा असावा

 शासकीय कामांची ठेकेदारी न करता केलेल्या कामांचा 
    दर्जा राखणारा असावा

 पंचायती समिती, जिल्ह्या परिषद अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असणारा असावा

 गावतील युवकांना व महिलांना संधी देणारा असावा

 गावातील गरीबांना अडचणीच्या काळात निस्वार्थी भावनेने मदत करणारा असावा

 गावातील सर्व लोकांना सोबत घेऊन काम करणारा असावा

  निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लोकांच्या पाय पडणारा नसावा.

मित्रांनो, इथे एक गोष्ट आवर्जून नुमद करावीशी वाटते, सरपंचामध्ये कीतीही चांगले गुण असले तरीही त्याला गावकऱ्यांच्या सहभागा शिवाय काहीच करता येत नाही. आणि जर लोकांनी दुर्लक्षित केले तर सरपंच फक्त नावाचा बनून राहतो. आणि मग तो गावाच्या विकासापेक्षा तो स्वतःच्या आर्थिक विकासाकडे जास्त भर देतो. त्यामुळे गावातील लोकांनी त्याला प्रतिसाद देणं, प्रोत्साहीत करणंही तितकंच आवश्यक असतं. लोकांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात व ग्रामसभेत आवर्जून सहभाग घेतला पाहिजे. गावाच्या विकासाचा भार एकट्या सरपंचावर देऊन गावे कधीच समृद्ध होऊ शकणार नाहीत. हे देखील तितकेच खरे..! त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात लोकसहभाग हा महत्वाचा ठरतो.

तुमच्या मनातील आदर्श सरपंच कसा असावा? टिप्पणी करून कळवा आणि लेख आवडला तर इतरांसोबत नक्की शेअर करा.

तुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात

 स्वतंत्र अथवा नविन ग्रामपंचायत स्थापना/विभाजनासाठी निकष व अटी

• ग्रामपंचायतीला एका वर्षात किती निधी मिळतो? 

• ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2021 पहा ऑनलाईन

• शासनाने दिलेला एकूण निधी ग्रामपंचायतीने कुठे खर्च केला? जाणून घ्या फक्त एका क्लीकवर


टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. अहमदनगर जिल्यातील राहुरी तालुक्यातील खंडांबे बु गावचे 27 वर्ष वय आणि पशुवैद्यकीय क्षेत्रांत उच्च पदवीचे शिक्षण घेतलेले युवा सरपंच कैलास दिलीपराव पवार हे व्यक्तिमत्त्व देखिल या लेखात दिलेल्या आदर्श सरपंच व्याख्येत तंतोतंत बसतात...त्यांनी covid काळात गावासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे ..

    उत्तर द्याहटवा

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.